जागावाटपाच्या वाटाघाटीवरून राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर नाराज
जागावाटपाच्या वाटाघाटीवरून राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर नाराज
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अजूनही त्यावर खलबतं सुरू आहेत. अशातच मविआच्या जागावाटपाच्या वाटाघाटी करताना काँग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका पार पाडली नाही, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते शुक्रवारी दिल्लीत झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काही अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेत्यांना जागावाटपासाठी चर्चा करण्यासाठी पाठविले होते. चर्चेअंती विदर्भ आणि मुंबईतील काही जागा शिवसेना उबाठाला सोडल्या गेल्या. ही भूमिका राहुल गांधी यांना पटली नाही. त्यामुळे त्यावर नाराजी व्यक्त केली. राज्यात काँग्रेसच्या वाट्याला ओबीसी प्रभाव असलेल्या किती जागा मिळाल्या आहेत, काँग्रेस पक्षाने ओबीसींना किती प्रतिनिधित्व दिले आहे, असा प्रश्नांचा भडिमारच राहुल गांधींनी केला. काँग्रेसच्या नेत्यांनी योग्य पद्धतीने वाटाघाटी केलेल्या नाहीत, असे मतही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, मेरिटच्या आधारावर काँग्रेसला जादा जागा मिळायला पाहीजे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जागा मिळायल्या पाहिजे होत्या. आम्ही त्या पक्षांना सांगितलं आहे. राहुल गांधी यांनाही आम्ही या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण, आघाडीतील मित्र पक्षांशी वाटाघाटी करून जागावाटप करावे लागले, त्यांनी काही जागांबाबत घोळ घातल्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत, असे आम्ही राहुल गांधींना सांगितले. राज्यामध्ये ‘सोशल इंजीनिअरिंग’ला राहुल गांधींनी अधिक महत्त्व दिले आहे. सत्तेमध्ये विविध समाजघटकांना सामावून घेतले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. म्हणूनच मतदारसंघनिहाय प्रभाव बघून ओबीसींना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
राज्यातील ओबीसी, दलित व मुस्लिम मतांचे गणित लक्षात घेऊन काँग्रेस १०३-१०५ जागा लढवण्याच्या तयारीत होते. मात्र, काँग्रेसला मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आग्रही भूमिकेमुळे सोडून द्याव्या लागल्या आहेत. काँग्रेसला या दोन्ही विभागांत अधिक जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसला काही जागा सोडाव्या लागल्या.
एकीकडे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपचा तिढा सुटला आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. पण, त्यांच्या दाव्याला उपरोक्त प्रकरणामुळे धक्का बसल्याचे दिसून येत आहे.